आज गुरुपौर्णिमा !! आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यासांनी वेदांचे संकलन केले. १८ पुराणे आणि उप-पुराणे यांची रचना केली. पाचवा वेद म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अशा महाभारताची रचना आजच्या पौर्णिमेच्या दिवशी पुर्ण झाली. "ब्रह्मसूत्र" या विश्वातल्या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या लेखनालाही आजच्या दिवशी सुरुवात झाली. महर्षी वेदव्यासांच्या या थोर कार्याविषयीची कृतज्ञता म्हणून सगळ्या देवदेवतांनी त्यांचे पुजन केले तो दिवस म्हणजे आषाढ वद्य पौर्णिमा!! म्हणूनच आजच्या दिवसाला "व्यास पौर्णिमा किवा गुरु पौर्णिमा" असे म्हणतात.
सद्गुरुंची थोरवी वर्णन करायची तर भाषा अपूरी पडते. सद्गुरुंचे दिव्य अस्तित्वच मुळी जगाच्या कल्याणासाठी असते. भूतमात्राविषयी दया हेच त्यांच्या जीवनाचे ब्रिदवाक्य. सूर्य, दिपक किंवा हिरा या प्रकाशमान वस्तुंमुळे दृष्य वस्तू दिसतात पण सद्गुरुंनी दिलेल्या ज्ञानप्रकाशात अदृष्य अशा ’ईश्वराचे’ दर्शन होते. चंदनाने तापलेल्या कायेला शितलता मिळते तर सद्गुरुंच्या कृपेमुळे त्रिगुणांनी तप्त झालेली काया शांत होते. सद्गुरुंचे महत्व समजणे फार अवघड आहे. एखाद्या गाईने खुप दुध दिले म्हणजे ती कामधेनू होत नाही त्याप्रमाणे शब्दज्ञानी कितीही पारंगत झाला तरी त्याला सद्गुरुंचे महत्व समजणार नाही. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते परंतू परिस कांही स्वत:हून लोखंडापर्यंत जाऊन पोहोचत नाही. सद्गुरु स्वत: शिष्यापर्यंत पोहोचतात. त्यांचा उद्धार करतात. त्यांचा मोठेपणा परिसाच्या मोठेपणापेक्षाही वरच्या दर्जाचा आहे.
सद्गुरु हे सुखाचे सागर आहेत, त्यांच्या सहवासात मनाला विसावा प्राप्त होतो. त्यांच्या सहवासात दु:ख आणि तळमळ यांचा लवलेशही नसतो. कल्पवृक्ष किंवा कामधेनू यांच्याजवळ मागितले की मिळते. चिंतामणी देखिल चिन्तन केले असता सर्व कांही देतो पण सद्गुरु मात्र न मागता देतात लौकिकातले आणि अलौकिकातले देखील.
सद्गुरु म्हणजे सद्गुणांनी धारण केलेले मनुष्यरुपच. शिष्यासाठी ईश्वराशी भांडण्याची क्षमता सद्गुरुंमध्येच असते म्हणून सद्गुरु हे सदैव आनंदस्वरुप असतात. मनाची शांतता, उन्नयन सद्गुरुंच्या कृपेने प्राप्त होऊ शकते. मी कोण आहे? कोठून आलो आहे? मला काय करायचे आहे ह्याचे ज्ञान सद्गुरुंनी दिलेल्या गुरुमंत्राच्या नित्य साधनेतून प्राप्त होते. गुरुंच्या सत्संगाने अनेकांची मनं एका पातळीवर येतात. इतरांना सामावून घेऊन भक्तीमार्गाची वाटचाल सुरु होते. आत्मिक उन्नतीला सुरुवात होते. आत्म्याला आत्म्याची ओळख होते.
असा सद्गुरंचा महिमा!! आजच्या या पवित्र दिवशी महर्षी व्यासांना आणि सद्गुरुंना त्रिवार वंदन!!!
3 comments:
गुरु गोविन्द दोनों खड़े किनके लागू पाव |
बलिहारी गुरुदेव की गोविन्द दियो दिखाय ||
dhanyavad Rajeshwari,
post vachalis, chhan. jyaa gurumule ishvarache darshan hote, tyaanche darshan pratham....kharach!!!!! tyana pratham vandan...!!!
मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
अधिक माहितीसाठी :
http://www.sanatan.org/mr/a/cid_316.html
Post a Comment